प्रतिनिधी/उस्मानाबाद
उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गामुळे देशातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि अहमदनगर-बीड-परळी वैजिनाथ या रेल्वेमार्गाप्रमाणेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला रेल्वेशी जोडण्याकरिता या प्रकल्पाला लागणार्या खर्चाच्या ५० % हिस्सा राज्य सरकारने रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी तात्काळ धोरणात्मक निर्णय घेऊन त्याबाबतचे संमतीपत्र संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी केंद्र शासनास पाठवावे, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.
राज्यातील आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत उस्मानाबाद आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या उस्मानाबादसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी याकरिता मागील तीन दशकांपासून सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या नवीन रेल्वेमार्गाचे २००९ साली सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्र या नवीन रेल्वेमार्गामुळे मराठवाड्याशी जोडला जाणार आहे. त्यातून मराठवाड्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग तुळजापूर मार्गे जात असल्याने देशभरातील नागरिकांना तुळजाभवानीच्या दर्शनाची सुविधा निर्माण होणार आहे व त्याबरोबरच देशभरातून तुळजापूर येथे भेट देणार्या भाविकांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ होणार आहे. तत्कालीन खासदार डॉ. पद्मसिंह पाटील साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे ४६८ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव अंतिम मंजुरी आणि निधी मिळविण्यासाठी २०१२ साली रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता.









