प्रतिनिधी / सातारा :
सध्या जिल्हा परिषदेत अभिलेख वर्गीकरणाचे काम सुरु आहे. या कामाचे सक्त आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिलेले आहेत. मात्र, काही विभागातील कर्मचाऱ्याकडून गौडांच्या आदेशाला कोलदांडा देण्याचा प्रकार सुरु आहे. अभिलेख वर्गीकरणामध्ये ज्यांच्याकडून कामच झाले नाही हे विभाग सीईओ गौडा यांच्या रडारवर आहेत. त्यामध्ये माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभागाचा समावेश आहे. त्यांना कामामध्ये हलगर्जीपणा का झाला. आपल्यावर का कारवाई करण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस बजावण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
जिल्हा परिषदेत काही विभागातील टेबलवरील कर्मचारी सकाळी थंब केल्यानंतर सायंकाळीच थंब करायला येतात. तर काहीजण टेबलवर असूनही कामेच करत नाहीत. हालचाल रजिस्टरवर नोंद नसते. सातारा जिल्हा परिषदेत सध्या सुरु असलेल्या अभिलेख वर्गीकरणाचे काम हे कर्मचाऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कर्मचाऱ्यांना कामात हयगय करु नका असे आदेश दिले गेले होते. त्यानुसार कामास सुरुवातही केली गेली. परंतु अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी काही विभागामधून कामच होत नसल्याचे समजले तेव्हा त्यांनी त्या विभागात जावून बैठका घेतल्या असता त्या विभागातील काही कर्मचाऱयांकडून कामे होत नसल्याची बाब समोर आली. त्यावरुन त्यांनी त्या त्या विभाग प्रमुखांच्या समक्षच कानउघडणी केली. त्यावरुन ज्यांच्या ज्यांच्याकडून कामे होत नाहीत याची यादीच काढण्यात आली असून त्यानुसार त्यांच्यावर नोटीस बजावण्याकरता नोटीसा तयार करुन त्या नोटीसा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बजावण्याचा पवित्रा घेतला आहे.









