जिल्हा प्रशासनाला अद्यापही गंभीरता नाही
पुरवठादार सर्व रुग्णालयांना लेखी कळवून झाला मोकळा
प्रतिनिधी / गोडोली
आधीच कोरोनाचा कहर, त्यात बाधितांची संख्या वाढत असून उपचारासाठी बेड मिळत नाहीत. जिल्ह्यात तब्बल ८३२७ रुग्ण उपचारार्थ असताना येत्या १६ सप्टेंबर पासून रुग्णालयांना एकमेव वितरकाकडून आँक्सिजन पुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे आता अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने वेळीच योग्य कार्यवाही करून ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ देऊ नये, अन्यथा बाधितांच्या आयुष्याचा दोर कमकुवत होऊन आस्मानी संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
राज्यात ऑक्सिजन तुटवड्या विषयी मोठ्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजन पुरवठादारांना तो उपलब्ध होत नसल्याने गंभीरता वाढली आहे. साताऱ्यातील रवीवैभव हा एकमेव ऑक्सिजन पुरवठादार असून त्यांच्या कडून जिल्हा रुग्णालयास सर्व खाजगी रुग्णालयांना तेच ऑक्सिजन पोच करतात.
मागणी वाढली असली तरी पुरवठादाराला संबंधित एजन्सीकडून पुरेसा पुरवठा होत नाही, मनुष्यबळ कमी होऊ लागले असून ऑक्सिजनसाठी सतत दबाव आणला जात आहे. यामुळे त्रस्त झालेल्या एकमेव पुरवठादार रवीवैभव एजन्सीने सर्व ग्राहकांना दि.१६ पासून ऑक्सिजन पुरवठा करणार नसून अन्य पर्यायी व्यवस्था करण्याबाबतीत लेखी पत्र दिली आहेत.
याबाबत रवीवैभव एजन्सीकडून जिल्हा प्रशासनाला वारंवार गंभीर परिस्थितीची माहिती देऊन ही योग्य उपाययोजना होत नसल्याचे सर्व ग्राहकांना सांगितलेचे समजले. रुग्णालयात उपचारासाठी बेड नसल्याने जिल्ह्यात मशीन ऑक्सिजन चळवळ सुरू झाली असताना रुग्णांना घरीच ऑक्सिजन मशीन लावली जात आहेत. विद्युत पुरवठा बंद झाल्यास हि मशीन बंद होतात. अधिक गरजू रुग्णांना रुग्णालयात ऑक्सिजन शिवाय म्हणजे आयुष्याचा दोर कमकुवत होणार असून जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला नाही तर आस्मानी संकट येऊ शकते. तरीही जिल्हा प्रशासनाने तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.









