वार्ताहर / औंध
कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाचे अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावर अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. शासनाकडून वित्तीय मान्यता प्राप्त होताच जिल्हानिहाय लक्षांक कळविण्यात येतील त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या सोशल मिडीयावर फिरणाऱ्या फसव्या बातम्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन औंधचे मंडलकृषी अधिकारी अक्षय सावंत यांनी केले आहे.
सावंत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना’ अशा आशयाची पोस्ट सध्या समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात असून त्याद्वारे शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना’ अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही किंवा याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीही सूचना प्राप्त नाही.
सन 2020 – 21 अंतर्गत राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत ‘कृषी यांत्रिकीकरण उप अभियान’ आणि ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ या अंतर्गत ट्रॅक्टरसाठी अनुदान अनुज्ञेय आहे. यासाठी शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यात येणार असून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने ज्येष्ठता क्रमवारी निश्चित करून उपलब्ध निधीच्या प्रमाणात पूर्वसंमती देण्यात येणार आहे. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. ‘कृषी यांत्रिकीकरण उप अभियान’ याचे संदर्भात दि. 14 जुलै 2020 चे शासन निर्णयानुसार ट्रॅक्टरसाठी अनुदानाचे दर घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना किमतीच्या 50% किंवा रु. १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 40% किंवा रु. १ लाख यापैकी कमी असेल याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.
कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाचे अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावर अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. शासनाकडून वित्तीय मान्यता प्राप्त होताच जिल्हानिहाय लक्षांक कळविण्यात येतील. याबद्दल शेतकऱ्यांस काही अडचण असल्यास त्यांनी मंडलकृषी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन सावंत यांनी केले आहे.
Previous Articleसोलापूर शहरात नवे 45 पॉझिटिव्ह, 2 जणांचा मृत्यू
Next Article सांगलीत आढळले दुर्मिळ फुलपाखरू









