बच्चू कडू यांचे आश्वासन; शिष्टमंडळाने घेतली मंत्रालयात भेट
वाठार किरोली / प्रतिनिधी :
राज्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी राखीव असलेली पदे भरण्यासाठी लवकरच विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाला दिली.
राज्य सरकारच्या पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीमध्ये माजी सैनिकांची १२३१ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबियांची संख्या अल्प प्रमाणात आहे. तरीही शिक्षण विभाग ही पदे भरण्यास उत्सुक नव्हता. शासनानेही याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे माजी सैनिक, वीर पत्नी, वीर पाल्य यांनी १६ डिसेंबर या विजय दिनापासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिष्टमंडळास मंत्रालयात चर्चेसाठी निमंत्रित केले होते. यावेळी मंत्री कडू यांनी शिष्टमंडळाची गत बुधवारी (दि.२) सकारात्मक चर्चा केली. तसेच लवकरच विशेष भरती प्रक्रिया राबवून माजी सैनिकांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, शिष्टमंडळाला लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणाची दिशा ठरविली जाईल. शिष्टमंडळात सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, कार्यकारी अध्यक्ष नारायण संकुले, कोकण विभाग प्रमुख सुभाश दरेकर, माजी सैनिक उमेदवार सुभेदार मेजर प्रभाकर काळे, माजी सैनिक अमर माने, माजी सैनिक राजेंद्र राजाळे आदी उपस्थित होते.
शिक्षण विभागातर्फे सहसचिव इम्तियाज काझी, कक्ष अधिकारी कविता तोंडे, प्रशासकीय अधिकारी राजेश शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.









