सातारा / प्रतिनिधी
कोरोना मुक्तीमध्ये आपल्याला चांगले यश मिळत आहे. सातारा जिल्ह्याने आठ हजार पेक्षा जास्त रुग्णांना बरे केले आहे. देशात हा विचार केला तर 28 लाखाचा टप्पा आपण गाठला आहे. आपल्या महाराष्ट्रात तब्बल सहा लाख रुग्ण बरे झाले आहेत.संपूर्ण चित्र दिलासादायक आहे .आता गाफीलपणा बाळगू नये, सर्व प्रकारची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी एका पत्रकाद्वारे केले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना नियंत्रणाचे काम अविरतपणे चालू आहे .अविरतपणे पाच महिने शासकीय अधिकारी, कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक कोरोनामुक्तीसाठी झटत आहेत.एका महत्त्वाच्या आदेशानुसार शासनाने कर्मचारी, अधिकारी तसेच; कार्यालयात भेट देणाऱ्या नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. संबंधित सर्वांनी या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे आहे.शासनाने नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार सविस्तर नियमावली तयार केली आहे.त्या पार्श्वभूमीवर .कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कार्यालयात आल्यावर काय खबरदारी घ्यावी तसेच नागरिकांनी कार्यालयात आल्यावर काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तरपणे शासनाने नियम पाठविले आहेत .त्यानुसार कर्मचारी तसेच नागरिकांनी कार्यालयात येते वेळी थर्मल स्कॅनर वर तापमान पहावे आणि खात्री करावी.कार्यालयाला भेट देणारे अभ्यागतांना मास्क वापरणे अनिवार्य आहे.तसेच कर्मचारी अधिकाऱ्यांना देखील पूर्णवेळ मास्क वापरणे अनिवार्य आहे .कार्यालयातील खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा.कर्मचाऱ्यांनी एकत्र थांबू नये.तीन फूट अंतर पाळावे.दर दोन तासांनी हात धुवावेत.कार्यालयातील वस्तू निर्जंतुक कराव्यात .दिवसातून तीन वेळा सर्व वस्तू स्वच्छ कराव्यात.एकत्र बैठका घेणे टाळून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधावा.अशा सूचना दिल्याचे सांगून आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे .कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश देण्यात यावा असे देखील आदेशात म्हटले आहे .कर्मचाऱ्यांपैकी कोणास विषाणूची लागण झाल्यास काय करावे याबद्दल देखील सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.अशा सर्वच सूचनांचे कर्मचारी ,अधिकारी आणि कार्यालयाला भेट देणार्या अभ्यागत यांनी काटेकोरपणे पालन करावे. मास्क, सामाजिक अंतर, हात धुणे यासोबतच गोल्डन वॉटर गोल्डन मिल्क आयुर्वेदिक काढा वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वच्छता अशा बाबीदेखील सांभाळाव्यात असे आवर्जून नमूद केले आहे. वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता आणि नियम काटेकोरपणे पाळल्यास या संकटावर मात करता येणे सहज शक्य आहे, असा विश्वास देखील डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी व्यक्त केला.









