प्रतिनिधी / केळघर
सातारा जिल्ह्यात काल, बुधवारी मध्यरात्री पासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यातच आज केळघर घाटात सकाळी रेंगडी-वरोशी दरम्यान म्हसोबाचा ओढा येथे दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरड कोसळल्याने दरडीचे दगड, चिखल, माती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर वाहतूक मंदावली होती. केळघर घाटात ७ ते ८ ठिकाणी दरडीचे दगड रस्त्यावर आले आहेत.
संततधार पावसामुळे व विटा-महाबळेश्वर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. पावसाचे पाणी शिरून रस्त्यालगतच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम संथपणे सुरू असल्याने व रस्त्याला नाले न काढल्याने केळघर येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.
मोरावळे, मेढा, केळघर ,मामुर्डी, आंबेघर, नांदगणे, गवडी, वरोशी,रेंगडी या गावातील रस्त्यालगतच्या शेतीत नाले नसल्यामुळे शेतीत पाणी घुसले आहे. तर केळघर ओढा पूल येथील पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने पर्यायी रस्त्याला पुरेशा मोऱ्या नसल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने ओढ्याकाठची दोन्ही बाजूची शेती जलमय झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
परिसरात संततधार पाऊस सुरू असून दरडी हटविण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. नाल्यांची कामे लवकरच पूर्ण केली जातील .: – कृष्णात निकम, उपकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग.
Previous Articleकर्नाटक: ज्येष्ठ क्रिकेटपटू बी. विजयकृष्ण यांचे निधन
Next Article कोल्हापूर : कुपलेवाडी रस्ता बनला मृत्यूचा सापळा









