महाराष्ट्र-गुजरातच्या सागरी हद्दीत बसविलेली रडार यंत्रणा अकार्यान्वित : देशातील 38 ठिकाणी रडार यंत्रणा
अमोल राऊत / मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सागरी किनाऱयांवर रडार यंत्रणा बसविण्यात आली. मात्र ही रडार यंत्रणाच सध्या नादुरुस्त होऊन अडगळीत पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच ही यंत्रणा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाने मुंबई पोलीस आणि नौदलाला दिली आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कोस्टगार्ड आणि नौदलाच्या मदतीने सागरी किनारपट्टीच्या हद्दीतील रडार यंत्रणांभोवती कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसेच रडार यंत्रणेसाठी आवश्यक तो निधी पुरवठा तत्काळ करावा, यासाठी 20 सप्टेंबर 2018 रोजी राज्य तसेच केंद्र सरकारला राज्य पेलीस, कोस्टगार्ड आणि नौदलाने प्रस्ताव पाठवून मागणी केली आहे. यापूर्वी 2014 आणि 25 ऑक्टोबर 2015, 2016 रोजी देखील असाच प्रस्ताव पाठविला होता. अद्याप याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. तारापूर, देवगड, टोळकेश्वर आणि गिरगाव या ठिकाणी 2012 साली सागरी सुरक्षेकरीता रडार यंत्रणा बसविली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते या रडार यंत्रणेचे अनावरण झाले होते. मात्र, सद्यस्थितीत या रडारमधील एकही यंत्रणा कार्यरत नसल्याची माहिती तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. तसेच तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. ऍन्टोनी यांच्या हस्ते देशातील 38 ठिकाणी बसविलेल्या रडार यंत्रणांचा 25 ऑगस्ट 2012 साली शुभारंभ केला होता. त्यावेळी गुजरात, दीव-दमण येथे रडार यंत्रणा बसविण्यात आली होती.
खोल समुद्रात शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांचे संदेश पकडण्यासाठी ही रडार यंत्रणा काम करणार होती. यासाठी या यंत्रणेत नेटवर्क कॉम्प्रेझींग स्टॅटीक रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टीक सेन्सॉरचे 84 नियंत्रण कक्ष स्थापन केले होते. मात्र यातील एकही रडार यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यातच नेहमीप्रमाणे पॅराशूटच्या सहाय्यानेच ही रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा घातकी कट आखल्याची माहिती नौदल, मुंबई पोलीस आणि तटरक्षक दलाला मिळाल्याने या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 2012 च्या सुरुवातीला मुंबई आणि रत्नागिरी येथील किनाऱयावर जवळपास तीन मोठी जहाजे भरकटली असताना याचा तपास ना या रडार यंत्रणांना लागला ना सागरी पोलिसांना. यामुळे सागरी सुरक्षेसाठी कार्यान्वित केलेल्या रडारांच्या क्षमतेत मोठय़ाप्रमाणात कमतरता असल्याचे आढळून आले आहे.
…असे आहे सागरी रडारचे काम
सागरी किनाऱयाच्या सुरक्षेसाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने रडार यंत्रणा कार्यान्वित केली. ही यंत्रणा शत्रूचे सांकेतिक संदेश पकडून त्यांची माहिती तटरक्षक दलाला देते. त्यानुसार तटरक्षक दल सांकेतिक भाषांमध्ये पकडलेले हे संदेश मुंबई पोलीस आणि पश्चिम विभागीय नौदलाकडे पाठविण्याचे काम करते. यामुळे शत्रू आणि दहशतवादी यांच्या हालचाली समजण्यास मदत होते. तसेच एखाद्या मशिनवर या रडारच्या लहरी जरी आदळल्या तरी त्याचा धोका या रडारमध्ये असलेल्या नेटवर्क
कॉम्प्रेझींग सेन्सॉरच्या माध्यमातून समजतो.









