रेट्रो वी मधील श्सुवासिनी हे पहिले गीत सादर करताना खूप अभिमान वाटत आहे. सुवासिनी हे गीत 1950 च्या काळातील लग्नगीत म्हणता येईल. हे गीत अनेक सुमधुर गीतांना चाली देणाऱया सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीर यांनी स्वरबद्ध केले असून श्रीपाद जोशी यांनी ते लिहिले आहे. या गाण्याची मूळ संकल्पना आणि या गाण्याची सादरीकरण संकल्पना सागरिका दास यांची असून या गीताचे प्रोमोज अनेक मालिकांतून आपल्याला परिचित झालेली अभिनेत्री सायली साळुंखे हिच्यावर चित्रित झाले आहेत. या अल्बममधील इतर सात गाणी पूर्ण वर्षभरात प्रदर्शित होतील असे सागरिका म्युझिकच्या सागरिका दास यांनी सांगितले.
सागरिका म्युझिक च्या 22व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे गीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. सागरिका म्युझिक आणि गायिका वैशाली सामंत यांचे नातं अनेक वर्षांपासून आहे. वैशाली सामंत यांचं सागरिका म्युझिकबरोबर नातं जुळलं ते ऐका दाजीबापासून आणि मग मस्त चाललंय आमचं, मेरा दादला, अंगणी माझ्या मनाच्या, घोटाळा आणि अशी अनेक उत्तमोत्तम गीते वैशाली सामंत यांनी सागरिका म्युझिकसाठी गायली आणि ती लोकप्रिय झाली. या वर्षी या हिट गाण्यांच्या प्रवासात सुवासिनी या गीताचा होणारा समावेशही रसिक श्रोत्यांना आनंद देणारा ठरेल . रेट्रो वी या अल्बममध्ये आठ रेट्रो स्टाईल गाण्यांचा समावेश असणे हे या अल्बमचे वेगळेपण ठरणार आहे. 1950 ते 1980च्या काळाचा विचार करून हिंदी आणि मराठी संगीतातील विविध शैलींचा विचार करून सादर केली जाणारी या अल्बममधील ही गाणी त्या काळातील संगीत शैलीचा आनंद देणारी आहेत.









