प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील विजयनगर येथे मंगळवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने थैमान घातले. यावेळी शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून कृष्णा शंकर नाईक (वय 65, रा. वड्डी) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सदर शेतकऱ्याच्या मृत्यू बद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी दुपारनंतर मिरज शहर आणि तालुक्यातील बहुतांशी गावांना पावसाने झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काहींच्या घरांवरचे पत्रेही उडून गेले. काही गावात लहान-मोठ्या दुर्घटना घडल्या.
वड्डी येथील शेतकरी कृष्णा नाईक यांची विजयनगर-म्हैसाळ येथे शेतजमीन आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नाईक हे शेतात भेंडी कडण्यासाठी गेले होते. या दरम्यान, अचानक मुसळधार पाऊस आला. वीजा कडाडू लागल्या. नाईक हे शेतातच असताना त्यांच्या डोक्यावर वीज येऊन पडली. नाईक हे तडफडू लागले. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मिशन रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.








