प्रतिनिधी / सांगली
जिह्यात मंगळवार, 21 पासून शंभर टक्के लॉकडाऊन होणार असे मेसेज पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून व्हायरल होत आहेत. यामध्ये तथ्य नाही. तथापि दिवसेंदिवस जिह्यात वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहता सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मास्कचा अनिवार्य वापर आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबतच्या संबंधित नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
गुरुवार, 16 जुलै रोजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱयांशी झूम ऍपद्वारे संवाद साधला. यामध्ये तूर्तास लॉकडाऊन करू नये, पण कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजनांची आणि या संदर्भातील नियमांची अधिक कडक व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे जिह्यात मंगळवार, 21 जुलैपासून शंभर टक्के लॉकडाऊन होणार अशा बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. त्याच वेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास, अनावश्यक गर्दी केल्यास यंत्रणांची पुन्हा बैठक घेऊन लॉकडाउन संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.








