पालकमंत्र्यांची घोषणा : १८ मे पर्यंत कडक अंमलबजावणी : लोकप्रतिधींबरोबरच्या आढावा बैठकीनंतर निर्णय
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात 5 ते 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळल्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला नसला तरी 30 टक्क्यांवर स्थिरावला आहे. त्यामध्ये घट करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आणखी तीन दिवस 18 मे सकाळी सातपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय सोमवारी घेण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली.

जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या परिणामांचा आणि कोरोना स्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला. कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, जयंत आसगावकर, अनिलभाऊ बाबर, सुधीर गाडगीळ, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, मानसिंग नाईक, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे सीईओ जितेंद्र डूडी, सांगलीचे आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंत्रणांनी काटेकोर समन्वय ठेवावा
मंत्री जयंत पाटील यांनी व्हेंटिलेटर बेड संदर्भात यंत्रणांनी अत्यंत काटेकोर समन्वय ठेवणे आवश्यक आहे. रुग्णाला व्हेंटिलेटर उपचारांची गरज असताना गैरसोय होऊ नये यासाठी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड डेडिकेटेड ठेवावेत. म. फुले जन आरोग्य योजना ज्या रुग्णालयांना लागू आहे त्यांनी रुग्णांना लाभ देणे आवश्यक आहे. जी हॉस्पिटल्स याला नकार देतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. ज्या हॉस्पिटल्समध्ये मृत्यु संख्या जास्त आहे, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल करून घेत आहेत त्यांचे ऑडिट होणे अवश्य असल्याचेही अधोरेखीत केले. जत तसेच अन्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तेथे आणखी आरोग्य व्यवस्था उपलब्ध व्हावी असेही त्यांनी निर्देश दिले.
कृषी निविष्ठा घरपोच द्या
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार खरीप हंगामासाठी शेतकऱयांची खते, बी-बियाणे, कीटकनाशके आदींबाबत गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी कृषि निविष्ठा दुकानदारांशी तत्काळ चर्चा करावी. कोरोना संसर्ग टाळून कृषि निविष्ठांची घरपोच डिलिव्हरी करता येईल का? याबाबत चर्चा करावी.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने आढावा सादर केला. जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्क्यांवर स्थिर असून दररोज पाच ते सहा हजार कोरोना टेस्टिंग होत आहेत. बाधितांची संख्या 1400 पर्यंत आहे. सद्यस्थितीत रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा पुरेसा असून 87 ते 88 रुग्णालयात कोव्हिड उपचारांसाठी सुविधा उपलब्ध आहे. त्यांना ऑक्सिजन पुरवण्यात येत असून रुग्णालयांची संख्या वाढल्यास त्यांना ऑक्सिजन पुरवठा करणे कठीण होईल, अशी वस्तुस्थिती विषय केली. रुग्ण संख्या नियंत्रण्याच्या दृष्टीने लॉकडाउनच्या कडक निर्बंधांची आणखी गरज त्यांनी व्यक्त केली. हॉटस्पॉट गावांमध्ये टास्क फोर्स पाठवून परिणामांची कारणमीमांसा केली जाईल असे या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात 144 कलम लागू : जिल्हाधिकारी
जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येत आहे. वैध कारणाशिवाय किंवा खाली दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. आदेशात सूट देण्यात आलेल्या बाबी व आस्थापना यांना सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी असेल, असे स्पष्ट करण्यात आले.








