प्रतिनिधी / मिरज
मालगांव (ता. मिरज) येथील चिदानंद सातलिंगआण्णा घुळी (वय 54) या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. घुळी हे जिह्यातील नामांकीत जयहिंद विकास सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक होते. नामांकीत संस्थेच्या संचालक शेतकऱ्यालाच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करावी लागल्याने मालगांव आणि परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून द्राक्षपिकाकडून सतत आर्थिक फटका बसल्याने घुळी कर्जबाजारी झाले होते. उत्पन्नाचे अन्य कोणतेही स्त्रोत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून चिदानंद घुळी नैराश्येत होते. आत्महत्या करण्याबाबत काही मित्रांसोबत त्यांनी बोलूनही दाखविले होते. मंगळवारी सकाळी ते पुन्हा द्राक्षबागेत गेले. घरालगतच असलेल्या आंब्याच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.








