गणवेशाची सक्ती : उच्च न्यायालयाचा आदेश पालनाची सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
हिजाब आणि भगव्या स्कार्फवरून तणाव निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने खबरदारी म्हणून मागील आठवडय़ात 9 फेब्रुवारीपासून राज्यातील माध्यमिक शाळा आणि सर्व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. सोमवारपासून नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने सूचना केल्याने सरकारने बुधवार दि. 16 फेब्रुवारीपासून पदवीपूर्व आणि पदवी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात गणवेशावरून निर्माण झालेला वाद काही प्रमाणात निवळला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रात्री बैठक झाली. या बैठकीत येत्या बुधवारपासून पदवीपूर्व आणि पदवी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. उच्च न्यायालयाने सूचना दिल्याने बुधवारपासून महाविद्यालये सुरू केली जात आहेत. सर्वांनी न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पालन करावे. विद्यार्थ्यांनी गणवेशच परिधान करून महाविद्यालयात यावे. न्यायालयाच्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये, असे त्यांनी सांगितले. बेंगळूरमधील रेसकोर्स रोडवरील ‘शक्तीभवन’ येथे आयोजित बैठकीत गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण तसेच शिक्षण आणि गृहखात्यातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.









