ऑनलाईन टीम / मुंबई :
महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेबदल होण्याची कोणतीही शक्यता नाही, काही जणांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या वावड्या उठवण्याचे काम सुरु असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नेहमीप्रमाणेच चर्चा झाली असल्याचेही जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, सरकारमध्ये कोणताही खातेबदल होण्याची चर्चा नाही, त्यामुळे कोणीही वावड्या उठवू नये. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे कोणतेही कारण नाही. ते आपले काम व्यवस्थित करत आहे. त्यामुळे असा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर नाही.
सचिन वाझे प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सरकार ठाम मताचे आहे. कोणी काही चुका केल्या असतील किंवा कोणी एखाद्या प्रकरणात सहभागी असेल, तर त्यात कोणाचीही बाजू घेण्याचा प्रश्न नाही. तसेच तसा विचारही सरकारमध्ये कोणीही करत नाही.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सचिन वाझे प्रकरणावर गृहमंत्र्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. सचिन वाझे यांना एनआयएनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ज्या गोष्टी एनआयएच्या तपासातून समोर येतील, त्यामध्ये कोणीही दोषी आढळले तर त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. हिच सरकारचीही भूमिका आहे. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही.








