ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात येणार आहे, अशी घोषणा गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली.
भाजपने सचिन वाझे यांच्या विरोधात सभागृहात कालपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. आज देखील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली आहे सचिन वाझें यांच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली.
सचिन वाझे यांची बदली झाली यावर आम्ही समाधानी नाही. सचिन वाझे यांची बदली नाही तर त्यांचे निलंबन केले पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे. जोपर्यंत सचिन वाझेंचे निलंबन होत नाही तोवर अधिवेशन चालू देणार नाही, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारे सरकार आहे. या सरकारची प्रतीमा मलीन झाली आहे. सचिन वाझेंना तात्काळ अटक झाली आहे. त्यांचे निलंबन करुन त्यांची चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेंवर कारवाई करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.
दरम्यान, सचिन वाझे प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणात विरोधकांनी सरकारची कोंडी केली आणि सत्ताधारी सभागृहात हा विषय हाताळू शकले नाही याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.








