वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ:
संयुक्त राष्ट्रसंघात भारताला एक मोठे यश मिळाले आहे. कमिशन ऑन स्टेट्स ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी भारताची निवड झाली आहे. ही समिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा (ईसीओएसओसी) हिस्सा आहे. भारताचा कार्यकाळ 2021 पासून 2025 पर्यंत राहणार आहे. समितीतील निवडणुकीसाठी 54 सदस्यांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत भारताला सर्वाधिक मते मिळाली आहेत. तर चीनला एकूण मतांच्या निम्मी मतेही मिळू शकलेली नाहीत.
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी यासंबंधी माहिती देणारा ट्विट केला आहे. भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका महत्त्वाच्या परिषदेच्या सीएसडब्ल्यू समितीत स्थान मिळविले आहे. लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरणासंबंधी आम्ही किती गंभीर प्रयत्न करत आहोत हे यातून दिसून येते. निवडणुकीत समर्थन देणाऱया देशांचे आभार मानतो असे तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. ट्विटमध्ये भारतीय विदेश मंत्रालयाही टॅग करण्यात आले आहे.
3 देश शर्यतीत
सीएसडब्ल्यूचा सदस्य होण्यासाठी भारत, चीन आणि अफगाणिस्तान शर्यतीत होते. 54 देशांच्या मतदानात भारत आणि अफगाणिस्तानला विजय मिळाला आहे. चीनला भारताच्या तुलनेत निम्मी मतेही मिळू शकलेली नाहीत. सीएसडब्ल्यू लैंगिक समानतेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. 1946 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती. ईसीओएसओसीमध्ये एकावेळी 45 सदस्य असतात. 11 सदस्य आशियातून निवडले जातात. याचबरोबर 9 दक्षिण अमेरिका तसेच कॅरेबियन देशांमधून, 8 पश्चिम युरोप आणि 4 पूर्व युरोपमधील सदस्य असतात.









