प्रतिनिधी/ सातारा
जो माणूस काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरुपूंचा त्याग करतो त्याला चांगले जीवन लाभते असे म्हटले जाते. या षडरिपूंमधील राग किंवा क्रोध हा प्रचंड घातक असतो. या रागानेच संगमनगरमधील एकाचा बळी गेल्याची दुर्देवी घटना घडली. घरात काहीतरी कारणातून भांडले झाल्यावर त्याने रागाच्या भरात घरातील काचेच्या खिडकीवर हाताने जोरात मारले. मात्र, हाताची नस तुटली अन् त्याच अवस्थेत उपचारासाठी दाखल केले मात्र, अतिरक्त स्त्रावाने त्याला मृत्यूने गाठले.
प्रशांत मोहन जाधव (वय 40, रा. सहकारनगर, संगमनगर, सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सातारा जिल्हा रुग्णालयातील पोलीस कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत जाधव हे संगमनगरमधील सहकारनगरमध्ये राहतात. दि. 16 रोजी सांयकाळी घरात काहीतरी भांडणे झाली. या रागातूनच जाधव यांनी स्वतः खिडकीची काच फोडून खिडकीवर जोराने हात मारला.
मात्र, हा फटका एवढय़ा जोराचा होता की त्यात जाधव यांच्या हाताची नस तुटली होती. मग सैरभैर झालेल्या नातेवाईकांनी तातडीने जाधव यांना उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात नेईपर्यंत त्यांच्या जखमी हातातून प्रचंड रक्तस्त्राव सुरु होता. उपचारास दाखल करुन करुन उपचार सुरु केले. मात्र, अतिरक्तस्त्रावाने त्यांना मृत्यूस सामोरे जावे लागले.
त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच उपस्थित नातेवाईकांना दुःख अनावर झाले होते. काही क्षणांचे भांडण झाले आणि अशा घटनेला सामोरे जाण्याची वेळ आल्याने सर्वजण सुन्न झाले होते. रागाच्या भरात जाधव यांनी स्वतःला त्रास करुन घेण्यासाठी केलेले कृत्याने त्यांना मृत्यूच्या दारातच पोहोचवले. शवविच्छेदन करुन मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.








