ऑनलाईन टीम / पुणे :
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप 2020-21 या वर्षातील खरीप हंगाम कर्ज वाटप व मान्सून कालावधीत धरणामधील पाण्याचे नियोजन व खबरदारीच्या उपाययोजना याबाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्हयांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 योजनेतील पात्र खातेदारांच्या यादीतील खाती निरंक झालेल्या व न झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाध्ये पीक कर्ज देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
त्यानुसार पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या पाचही जिल्हयांतील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी व ग्रामीण भागातील बँकांनी पीक वेळेत पीक कर्जाचे वाटप करावे. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कमी प्रमाणात कर्ज वाटप असलेल्या बँकांचा विशेष आढावा घेवून इष्टांक पूर्ण करावा. शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनीही दक्ष राहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.








