केंद्र सरकारवर मागण्यांसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच 31 जानेवारी हा दिवस शेतकरी संघटना ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा करणार आहेत. केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर वर्षभरानंतर संयुक्त किसान मोर्चाकडून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, यावेळी शेतकऱयांच्या अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, ते आश्वासन अद्यापही सरकारने पूर्ण केले नाही, त्याविरोधात आता संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक झाला आहे. केंद्र सरकार विरोधात पुन्हा एकदा 31 जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसहीत अन्य राज्यांमध्येही जिल्हा व तहसील स्तरावर हे आंदोलन केले जाणार आहे.
संयुक्त किसान मोर्चाने हमीभाव कायदा करणे आणि आंदोलनादरम्यान शेतकऱयांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत या प्रमुख मागण्या आहेत. शेतकऱयांच्या इतर मागण्यांमध्ये वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱयांना भरपाई देण्यासंबंधीच्या मागण्यांचाही समावेश आहे.
…तर पुन्हा आंदोलन: टिकैत
शेतमालाला असणारा हमीभाव हा शेतकऱयांचा कणा आहे. शेतीचे भविष्य वाचवण्यासाठी शेतकऱयांना हमीभावाचा कायदाच हवा असल्याचे वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. हमीभावाचा कायदा करण्यासाठीची आमची लढाई सुरू असून, पुढेही सुरूच राहणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱयांनी वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केले. यामध्ये 700 हून अधिक शेतकऱयांनी आपला जीव गमावला आहे. मागील वषीचे हे दिवस कधीही विसरणार नसल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे.









