वार्ताहर / परळी
स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल अथवा त्यांचे बौद्धिक कौशल्य अनुभवायचे असेल, तर इतिहासाचे साक्षीदार ह्या गड-किल्ल्यांना भेट दिलीच पाहिजे. साताऱ्यात अनेक गड-किल्ले आहेत, ते आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. हेच अस्तित्व जतन करण्यासाठी अंबवडे बुद्रुक येथील ग्रामस्थ गेल्या कित्येक वर्षांपासून दिवाळीत गड-किल्ल्यांच्या स्पर्धांचे आयोजन करत आहेत.
सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या अंबवडे बुद्रुक या गावात 2012 पासून म्हणजे तब्बल नऊ वर्ष ही गड- किल्ल्यांची स्पर्धा भरवली जाते. किमान गावांमध्ये 35 ते 40 किल्ल्यांच्या प्रतिकृती ह्या उभ्या केल्या जातात. यामध्ये ग्रामस्थही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. परंतु , यावर्षी पाऊस आणि कोरोना अशा नैसर्गिक आपत्तीमुळे मुले गडकिल्ले तयार करतील का ?, ही मोठी शंकाच होती. मात्र, कोणत्याही संकटांची तमा न बाळगता पुन्हा एकदा किल्ल्यांचे गाव म्हणजे अंबवडे बुद्रुक हे सिद्ध करत जवळपास 35 ते 40 गड-किल्ले हे उभारण्यात आले आहेत. ह्या गड-किल्ल्यांचा आकार व भव्यता एवढी मोठी असते की, जवळपास एक ते दोन गुंठा जागेत हे गड किल्ले बांधले असतात.
अंगणात उभा केला जाणारा तो दुर्ग किती फार तर स्वतःच्या उंच एवढा, पण त्यामागची प्रेरणा मात्र तोरण एवढी आहे, तसेच या स्पर्धेमुळे बालवयातच शिवरायांच्या तेजस्वी आणि ओजस्वी इतिहासाचे बाळकडू मिळाले तर हीच मुले उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतील, हा उद्देश बाळगूण संपूर्ण गाव एकजूट होऊन हिरीरिने सहभाग घेतानाचे चित्र दिसून येत आहे. किल्ला बनवताना कमीत कमी खर्चात तयार करण्याचे आव्हान असते, त्यामुळे तटबंदी बनवताना माती, शेण, राख याचा वापर केला जातो, तसेच गडावरचे सैनिक कागदाने घरी तयार केले जातात. अशा निसर्गाचे भान ठेवून या स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते. यामुळे लहान वयातच शिवरायांचे विचार रुजण्यासाठी नक्कीच प्रयत्न उपयुक्त ठरू शकतो.
आज-उद्या गड-किल्ल्यांची स्पर्धा
किल्ला करताना किंवा गडकोट उभारताना तो एखाद्या गडदुर्गासारखा हुबेहूब व्हावा, असा अट्टहास नसतो. पण, तो किल्ला उभा करण्यामागची भावना राजगडला टक्कर देणारी असावी लागते. याच उद्देशाने सातारा जिल्ह्यातील गडप्रेमींना आंबवडे येथे प्रतापगड, रामशेज, तोरणा, जंजिरा, विजयदुर्ग, सज्जनगड, रायगड, राजगड यांसारख्या कित्येक गडकिल्ले पाहायला मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज-उद्या गड-किल्ल्यांच्या स्पर्धांचे आयोजन अंबवडेत करण्यात आले आहे.









