324 पैकी 44 शिक्षकांना सोडणार, 280 शिक्षकांचा निर्णय अद्यापही नाही
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तीन चार महिन्यांपूर्वी आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या मात्र अद्यापही सुमारे 324 शिक्षकांना सोडण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांमधून प्रचंड नाराजीचे सूर उमटत आहेत. रिक्त जागा भरूनच बदल्या करण्यात आल्या असत्या तर चालले असते बदली झाल्यानंतर रिक्त जागेचा विचार केला जातोय यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रिया बदली झालेल्या शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
कोरोना काळातच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत तीन चार महिने झाले तरी रिक्त पदांचे कारण असल्याने सोडले जात नाही आहे. त्यामुळे बदलीनंतर लॉकडाऊनमध्ये बहुतांश शिक्षक पर जिल्हय़ात आपल्या गावी गेले आहेत 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने मोठय़ा विवंचनेत सापडले आहेत. बदली झाली असतानाही अद्यापही सोडण्यात आले नाही पुन्हा शाळेत आता हजर व्हायचे की नाही? असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. मराठवाडा, विदर्भामधीलही शिक्षक जिल्हय़ात आहेत. लॉकडाऊन काळात ही लोक गावी गेलेली आहेत. 9 ते 12 पर्यंतचे शिक्षण 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने इतर शिक्षकांना आता दिवाळी सुट्टीनंतर हजर व्हावे लागणार आहे. मात्र नेमके रिक्त पदाच्या कारणास्तव शिक्षकांना सोडले जात नाही की अन्य काही अडचणी आहेत याबाबत अद्यापही साशंकता असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
सर्व 324 शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी सोडावेच लागेल…..
रत्नागिरी जिल्हय़ातील सुमारे 324 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. अद्यापही त्यांना सोडले जाते, रिक्त जागेचा प्रश्न असल्याने हा निर्णय अद्यापही घेण्यात आला नाही मात्र 324 पैकी 44 शिक्षकांना लवकरच सोडण्यात येणार आहे असे कळले मात्र ही बाब चुकीची आहे. 324 शिक्षकांना सोडवेच लागेल तसे शासनाचे आदेश आहेत. तरी देखील कोणत्या निकषावर या शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात येत नाही याबाबत ग्रामविकास मंत्र्याकडे तक्रार करण्यात येणार आहे असे ठाकरे यावेळी म्हणाले.









