प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नयेत यासाठी 1 ते 16 वर्षे वयोगटातील शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्हा पंचायत, शाळा सुधारणा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण होणार आहे. यामुळे केवळ शिक्षकांकडूनच नव्हे तर बालकल्याण खाते आरोग्य विभाग, अंगणवाडी कर्मचारी यांचा देखील सर्वेक्षणात सहभाग राहणार आहे. विद्यार्थी शाळा-शिक्षणापासून दूर जाऊ नयेत, या उद्देशाने सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दरवर्षी शिक्षण विभागातर्फे शाळाबाहय़ मुलांचा शोध घेतला जातो. शिक्षकांकडून घरोघरी भेटी देऊन शाळाबाहय़ मुले शैक्षणिक प्रवाहात आणली जातात. मात्र यंदाची स्थिती पाहता मागील आठ ते दहा महिन्यांपासून विद्यार्थी शाळेच्या प्रवाहापासून दुरावले आहेत. यामुळे यंदा शाळाबाहय़ मुलांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे सर्वेक्षणाच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
अनेक कुटुंबे स्थलांतरित
लॉकडाऊनच्या कार्यकाळात अनेक कुटुंबांना बेरोजगारीचा सामना करावा लागला होता. यामुळे अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली. परिणामी परगावाहून बेळगावमध्ये व बेळगावमधून परगावी गेलेल्या कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित आहेत. सदर विद्यार्थ्यांनी शाळेत नाव दाखल केले आहे की नाही याचा शोध घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थी शाळा सोडून छोटी मोठी कामे देखील करताना दिसून आहेत. शिवाय अंगणवाडीतून पुढे पहिलीत प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या देखील रोडावली आहे. यामुळे शिक्षणाला गळती लागू नये याचा विचार करत शाळाबाहय़ मुलांच्या सर्वेक्षणासाठी विविध खात्यांच्या सहभागातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.









