- केंद्र सरकारने घेतला निर्णय
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने घातलेली व्हिसा बंदी आता हटवली आहे. इलेक्ट्रॉनिक, पर्यटन आणि वैद्यकीय श्रेणी वगळता सर्वांना प्रवासासाठी व्हिसा बंदी उठविल्याने याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरविले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.

गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकार पर्यटक वगळता सर्व ओसीआय, पीआयओ कार्डधारक आणि इतर परदेशी नागरिकांना व्हिसावर कोणत्याही हेतूने भारतात येण्याची परवानगी देत आहे. ते अधिकृतपणे चेक पोस्टद्वारे हवाई किंवा जलमार्गाद्वारे देशात प्रवेश करू शकतात.
मात्र, परदेशातून येणाऱ्या लोकांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या क्वारंटाईन आणि कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येण्यास इच्छुक असलेले परदेशी नागरिक वैद्यकीय अटेंडंटसमवेत वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करू शकतात.









