मृण्मयी आणि ममता दोघी सख्ख्या बहिणी. मृण्मयी शाळेत कायम आघाडीवर. वक्तृत्व, लेखन, अभ्यास यात कायम अव्वल!! अर्थात त्यामुळे शाळेत सर्वांचीच लाडकी विद्यार्थिनी! ममता त्या मानाने तशी ऍव्हरेज. अनेकदा अगदी सहज रीतीने दोन बहिणींमधे कळत नकळत तुलनाही होत असे. परंतु ममताला मृण्मयीचे कौतुकच होते. हेवा, राग या गोष्टी नव्हत्या. दोघींचेही नाते अगदी छान होते. कॉलेजनंतर मात्र ममताच्या यशाचा आलेख उंचावत गेला आणि मृण्मयीचा काहीसा कमी कमी होत गेला.
त्यामुळे मृण्मयीचे सतत नाराज होणे, चिडचिड याचे वाढलेले प्रमाण या साऱयाने त्रस्त होऊन मृण्मयीची आई तिला घेऊन माझ्याकडे आली होती. मृण्मयीची बौद्धिक हुशारी बोलताना लक्षात येतच होती परंतु असे असूनही आपण मागे का पडतो आहोत हे तिच्या लक्षात येत नव्हते. बऱयाचवेळा मृण्मयी अनेक स्पर्धांमधे भाग घ्यायची, एकाच वेळी अनेक गोष्टी, कामे करायला जायची परंतु वेळेच्या नियोजनाचा अभाव सारी गडबड उडवून द्यायचा. हेही करायचे आहे आणि तेही करायचे आहे परंतु त्या कामांचा, ठरवलेल्या गोष्टींचा नीट मेळ घालता यायचा नाही आणि सारी गडबड उडायची. नेमकी गल्लत तिथेच होत होती.
एका वेळी विविध काही करण्याची उर्मी होती परंतु ‘वेळेच्या नियोजनाचा अभाव’ गडबड करत होता. याउलट ममता अगदी मोजक्मयाच गोष्टी करत होती परंतु तिचे नियोजन, वेळेची आखणी उत्तम होती. त्या बळावर ममता ती निवडेल त्या क्षेत्रात, कामांमधे यशस्वी वाटचाल करत होती.
मृण्मयी भेटायला आली त्यावेळी बराच वेळ चर्चा झाली. मूल्य निश्चिती, कृती आराखडा, कामांची विभागणी, वेळेचे नियोजन अशा अनेक मुद्यांवर चर्चा झाली. मृण्मयीनेही टप्प्याटप्याने सारे लक्षात घेत तशी वाटचाल सुरुही केली. वेळेच्या नियोजनाअभावी अनेकांची गडबड उडते. ते टाळण्यासाठी प्रयत्नपूर्वक काही गोष्टी करणे आवश्यक आहे.
मुळातच कोणतेही काम करताना, कामाचा कृती आराखडा तयार करताना तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
1. आपल्याला काय करायचे आहे याबाबत स्पष्टता हवी.
2. गोष्टींचा प्राधान्यक्रम अर्थात कोणत्या गोष्टी केव्हा करायच्या ते ठरवायला हवे.
3. हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण होण्यासाठी वेळेची आखणी करायला हवी. कोणत्या कामासाठी किती वेळ वापरायचा, वेळ कुठे वाया जाऊ शकतो, तो कसा वाचवायचा यासाठी कामांची वर्गवारी पुढील गटात करता येते.
1. महत्त्वाची आणि निकडीची कामे
2. निकडीची परंतु कमी महत्त्वाची
3. महत्त्वाची पण निकड नसलेली कामे
4 ना महत्त्वाची, ना तातडीची कामे
पहा हं.. घरात एखादी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे नेणे हे महत्त्वाचे आहे आणि तातडीचेसुद्धा. याउलट बाजारातून आणलेली एखादी भाजी निवडून ठेवायची आहे, दरमहा येणारे वीजबिल ठरावीक मुदतीच्या आत भरायला हवे ही कामे महत्त्वाची असली तरी तातडीची नाहीत. ती लक्षात ठेवून त्या कालावधीत सोयीसवडीने करता येतात. चौथ्या प्रकारात मोडणाऱया बऱयाच गोष्टी सांगता येतील. मोबाईल, फेसबुक, इन्स्टा यावरचे तास न् तास चालणारे चॅटिंग यामधे किती वेळ वाया जातो हे आपण सारेच जण पाहतो आहोत. या माध्यमांचा आवश्यक तो उपयोग अवश्य करावा परंतु काही अनावश्यक गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळता यायला हव्यात.
मुळातच आपल्याला नेमके काय करायचे आहे ते ठरवून कामाचे नियोजन केले तर वेळेचे नियोजन आपोआप होते. महत्त्वाच्या कामांची यादी करून ठेवता येते.
तसेच ‘प्लेस फॉर एव्हरिथिंग अँण्ड एव्हरिथिंग इन इट्स प्लेस’ हे साधे परंतु महत्त्वाचे तत्त्व पाळायची सवय जर लावून घेतली तर वेळ, शक्ती या दोन्ही गोष्टी वाया जात नाहीत.
काही वेळा व्यक्तीचा काळजीखोर, रागीट, भिडस्त, अतिसंवेदशील स्वभावही वेळेचे गणित बिघडवू शकतो. मनात नाराजी असेल तर आपल्या कामावरती परिणाम होऊ शकतो. समजा घरात काही वादविवाद झाला, बराच काळ मूड खराबच राहिला तर कामावर परिणाम होऊ शकतो. तेच काम करायला अधिक वेळ लागू शकतो. या किंवा यासारख्या अनेक गोष्टींमुळे वेळ वाया जाऊ शकतो. त्यासाठी स्विच ऑन, स्विच ऑफ’ हे तंत्र आत्मसात करायला हवे. साक्षीभावाने विचार, भावना न्याहाळण्याचा सराव केल्यास या गोष्टी टाळता येऊ शकतात आणि वाया जाणारा वेळ वाचवून स्वतःला योग्य कृतीकडे वळवणे, आवश्यक तिथे लक्ष देणे जमू शकते.
आपल्या वेळेची विभागणी मुख्यत्वेकरून तीन भागात होत असते. पहिला भाग डय़ूटी अवर्स, विद्यार्थ्यांच्याबाबतीत अभ्यासाचे तास किंवा क्लासची वेळ असे म्हणता येईल. घरी बसून करायच्या कामाचाही यात अंतर्भाव करता येईल. दुसरा भाग मेटेंनन्स टाईमचा. यात स्वतःच्या तसेच इतरांच्या, घराच्या देखभालीसाठी लागणाऱया वेळेचा अंतर्भाव असतो. जसे खाणे, झोपणे, साफसफाई, आवराआवर, इतरांसाठी खर्ची पडणारा वेळ असतो. तिसरा भाग डिर्स्कीशनरी टाईम. वरील सर्व आटपून उरलेला मोकळा वेळ जो फक्त स्वतःसाठी असतो आणि तो आपल्याला हवा तसा आपण खर्च करू शकतो.
काही वेळा आपले लक्ष विचलित करणारे, कामात व्यत्यय आणणारे टाईम चीटर्सही भेटतात. उदा. उगीचच काही देण्याघेण्याचे निमित्त करून तास न् तास येऊन बसणारे मित्र मैत्रिणी, सहज म्हणून फोन करून तासभर काढणारे काही लोक अशांना आपणच प्रयत्नपूर्वक आपल्याला आता वेळ नाही याची जाणीव करून द्यायला हवी.
काही जणांच्या भिडस्त स्वभावामुळेही गोंधळ होतो. अनेकदा उगीचच हो ला हो म्हटले जाते आणि अनेक कामे अंगावर येऊन पडतात. त्यामुळे ठामपणाचे कौशल्य, सभ्य नकार देण्याचे तंत्र आत्मसात करून त्याचा अवलंबही केला पाहिजे.
वेळेचे नियोजन करताना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे वेळेचे नियोजन करणे म्हणजे स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवणे नव्हे, तर उपलब्ध वेळेत आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी कशा करता येतील ते ठरवणे. यामधे स्वतःसाठी मोकळा वेळ काढण्याचाही समावेश होतो. ते करण्यासाठी उपलब्ध वेळेचा आणि ठरलेल्या कामांचा एकत्रितपणे विचार करायला हवा. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तसे नियोजन आणि कामांची आखणीही करायला हवी.
मूल्य निश्चिती, वेळेचे नियोजन, कामांची आखणी या गोष्टी व्यवस्थित केल्यास यशाचा टप्पा दूर नाही हे मात्र निश्चित!!
-ऍड. सुमेधा देसाई








