प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्यातून किंवा परजिह्यातून आलेल्या विस्तापितांसाठी मे आणि जून महिन्यामध्ये रेशनचे वितरण केले जाणार आहे. ज्याच्याकडे रेशनकार्ड नाही, ज्याचे घर नाही त्याला केवळ आधारकार्डच्या आधारे रेशन दिले जाणार आहे. मात्र कोणीही खोटी माहिती दिल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई किंवा त्याला कारावासाची शिक्षाही भोगावी लागणार, असे पत्रक जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी काढले आहे.
कोरोनामुळे परराज्यातून व परजिह्यातून आलेले कामगार किंवा सर्वसामान्य नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रेशन वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक व्यक्तीला 5 किलो तांदुळ आणि हरभरा दिला जाणार आहे. मात्र त्या व्यक्तीकडे रेशनकार्ड असू नये, अशी अट घालण्यात आली आहे. या ठिकाणी त्याचे स्वतःचे घर राहू नये. तो परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील असवा. आधारकार्ड घेऊन त्याला रेशन दिले जाणार आहे. मोबाईलवर ओटीपी क्रमांक आल्यानंतर त्याला रेशन दिले जाणार आहे. जर याबाबत कोणीही खोटी माहिती दिली तर संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर कारावासही भोगावा लागणार आहे









