प्रतिनिधी/मुंबई
मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मला बेकायदेशीररीत्या घरात कोंडून ठेवले. ते महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांचा पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. काही मंर्त्यांची ईडीकडून चौकशीही सुरू झाली आहे. यावेळी कुणी राजकीय नेता नाही, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना लक्ष्य केले आहे. त्यांच्याविषयी त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
हसन मुश्रीफ यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी कोल्हापूरला जाणार्या किरीट सोमय्या यांना पोलिसांनी त्यांच्या घरातच कोंडून ठेवले होते. त्या कारवाईबाबत किरीट सोमय्या यांनी म्हणाले की, विश्वास नांगरे पाटील यांनी ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करता येत नाही हे लक्षात घ्यावे. त्यांनीच बेकायदेशीररित्या घरात कोंडून ठेवले. पोलिसांना तेच सूचना देत होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. कोल्हापूरला जाताना पोलिसांनी ज्या पद्धतीने रोखले त्याविरोधात किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली आहे.
…म्हणून केंद्राकडे जावे लागते
पंधराशे कोटी रुपयांचे कंत्राट हसन मुश्रीफ यांनी कायद्यात तरतूद नसतानाही स्वत:च्या जावयाला दिले. ग्रामपंचायतीचा खर्च कमी आणि त्यांना वर्षाला 50 हजार रुपये कंपनीला द्यावे लागणार आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होणार आहे. हे सगळे काम अँटिकरप्शने करायला पाहिजे होते. पण अँटिकरप्शनलाच यांनी करप्ट केले आहे. राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करते म्हणून आम्हाला केंद्राकडे जावे लागते, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.








