प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणात कोकणातील सर्वात मोठय़ा लांबीच्या वाशिष्ठी नदीवरील पुलाची एक मार्गिका सप्टेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. मात्र 20 दिवसांच्या आतच या पुलावरील कॉंक्रीट उडून गेले असून लोखंडी सळय़ाही बाहेर पडल्याने पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महामार्गावरील पुलांचे भूमिपूजन झाल्यानंतर 2018 मध्ये वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या कामास प्रारंभ झाला. नंतर मुळ व पोटकंत्राटदार यांच्यातील वादात पूल रखडला. पुढे मुळ कंत्राटदार बदलून हा पूल ईगल चेतक इन्फ्रा कंपनीकडे 2019 मध्ये सोपवण्यात आला. 247.5 मीटर लांबीचा असलेला हा पूल कोकणातून जाणाऱया मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठय़ा लांबीचा आहे. एका मार्गिकेची रूंदी 12 मीटरची असून त्याची फाऊंडेशनपासूनची उंची 14.300 मीटर इतकी आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या पुलावरील वाहतुकीसाठी दिलेली मुदत, जवळ येऊन ठेपलेला गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर या पुलाचे काम घाईगडबडीत करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते उद्घाटन झालेल्या या पुलावर आता महिनाभराच्या आतच खड्डे पडू लागले आहेत. चिपळूणहून मुंबईकडे जाताना पुलावरील शेवटच्या टोकाला कळंबस्ते येथे तर कांक्रीट पूर्णपणे जाऊन आतील लोखंडी सळय़ाच बाहेर पडल्या आहेत. अवघ्या 20 दिवसांतच कोटय़वधी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नवीन पुलाचे कॉंक्रीट उडून जात सळय़ाच बाहेर पडल्याने पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. दरम्यान, पुलाच्या या दुर्दशेबाबत एकही राजकीय पदाधिकारी काहीच बोलताना दिसत नाही. उद्घाटनाला सर्व राजकीय मंडळी उपस्थित होती. मात्र आता सर्व चिडीचूप झाली आहेत.









