प्रतिनिधी / रत्नागिरी
जून महिन्यात ज्या विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. ते पुन्हा काही बाधितांच्या संपर्कात आले. त्यांची चाचणी केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले. या रि इन्फेक्शनमुळे कोरोना झालेल्यांना पुन्हा कोरोना होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे. अशी घटना जिह्यात पहिलीच असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मंदावल्याने जनतेसह सर्व यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला. मात्र कोरोनावर मात केलेल्यांना पुन्हा कोरोना झाल्याचे उघड झाल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनामुळे ऍन्टीबॉडी तयार होऊन पुन्हा कोरोना होत नाही. या गृहितावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिह्यात कोरोनाच्या ‘रि इन्फेक्शन’च्या पहिल्याच 2 केसेस सापडल्या आहेत. मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे नव्हती. आरोग्य यंत्रणेने त्यावर अभ्यास सुरू केला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यापुढे कोरोनाचे रि इन्फेक्शन झाल्याच्या दोन केसेस आल्याचे त्यांनी सांगितले. एकदा कोरोना झाला की, ऍन्टीबॉडीज तयार होतात. म्हणजे या विषाणूविरुद्ध लढणारी प्रतिकारक्षमता तयार होते. त्यामुळे पुन्हा कोरोना होण्याची शक्यता कमी असल्याचा दावा यापूर्वी आरोग्य यंत्रणेने केले होता, मात्र तो या दोन प्रकारामुळे फोल ठरला आहे. जिह्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे यंत्रणा चांगलीच कामाला लागली. वाढत्या प्रसारामुळे लॉकडाउन वाढवण्यात आले. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर सक्तीचे करण्यात आले. तरी गणेशोत्सवानंतर जिह्यात कहरच झाला. ऑक्टोबर महिन्यात मात्र कोरोनाचा प्रभाव कमी-कमी होत चालला आहे. गेल्या 2 दिवसात अल्प रुग्ण सापडत आहेत. बरे होण्याचे प्रमाण 90 टक्केच्या वर गेले आहे. त्यामुळे जिह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आल्याने आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.
कोरोना रि इन्फेक्शनची जिल्ह्यात प्रथमच घटना
जून महिन्यात कोरोनावर मात केलेले विद्यार्थी काही पॉझिटिव्हच्या संपर्कात आले. त्यांची पुन्हा चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोना रि इन्फेक्शनची जिह्यातील पहिलीच घटना आहे. त्या बाबत आम्ही मार्गदर्शन मागवले आहे.
-डॉ. संघमित्रा फुले-जिल्हा शल्य चिकित्सक
Previous Articleमेर्वी येथे भर दुपारी पाडीवर वाघाचा हल्ला
Next Article चिपळुणात सात शिकारी अटकेत !









