ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. यावेळी राऊतांनी थेट ईडीवर आरोप केलेत. भाजपंच्या मदतीने चौकशी सुरू करून खंडण्या वसूल करायच्या हा सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचा उद्योगच झाला असल्याचं म्हटलं आहे. तसेच संजय राऊतांनी ‘ईडी’ ही भाजपची एटीएम मशीन झाली आहे, असा आरोप करत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील लवकरच तुरुंगात जातील, असा इशारा दिला. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट संजय राऊतांना पत्र लिहून पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी फेब्रुवारी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहलं होतं. या पत्राच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी संजय राऊतांना काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. पत्रात राहुल गांधी यांनी संजय राऊतांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना ८ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्राची दखल घेतली आहे.

या पत्रात राहुल म्हणतायेत, तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना टार्गेट केलं जात असल्याचा मी निषेध करत असून तुमच्या पत्रातून मोदी सरकार विरोधकांना शांत करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा खुलासा झाला आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असून कोणतीही भीती आणि अनुकूलता न दर्शवता तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहोत असं राहुल गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी लिहिलेलं पत्र संजय राऊत यांनी ट्वीटरला शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, ही वेळ सुद्धा निघून जाईल असं संजय राऊत म्हणाले आहेत.










