प्रतिनिधी/ सातारा
मध्यप्रदेश येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सातारा जिह्याने सोनेरी कामगिरी करत 18 सुवर्ण पदकांची कामगिरी करत सातारा जिह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून एकूण 18 सुवर्ण, 3 रौप्य, व 3 कांस्य पदके मिळवून मोलाची कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये 22 राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते.
26 ते 30 सप्टेंबर 2021 रोजी माधव सेवा न्यास, उज्जैन, मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा 2020-21 संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सातारा जिह्याच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके मिळवून दैदिप्यमान कामगिरी केली. या स्पर्धेत सातारा जिह्यातील एकूण 11 खेळाडूंचा समावेश होता. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व टिकवून ठेवले. पदकांची कमाई करण्यात सातारा जिह्याच्या खेळाडूंनी सिंहाचा वाटा उचलला.
या स्पर्धेत सातारा जिल्हय़ातील 12 वर्षाखालील मुले/मुली वयोगटामध्ये वैष्णवी पवार (4 सुवर्ण पदके), आयुष शिंदे (3 सुवर्ण व 1 रौप्य पदके), आयुष काळंगे (2 सुवर्ण व 1 कांस्यपदक), अथर्व भिसे (1 सुवर्ण पदक). 14 वर्षाखालील मुले/मुली वयोगटामध्ये भार्गवी गोसावी (1 सुवर्ण पदक), ओम पाटील (1 कांस्य पदक), वेदांत कदम (1 कांस्य पदक) पटकावले आहे.
तर 16 वर्षाखालील मुले/मुली प्रणाली मोरे (3 सुवर्ण व 1 रौप्य पदके), भक्ती मोरे (2 सुवर्ण व 1 रौप्य पदक), 16 वर्षावरील मुली वयोगटामध्ये पल्लवी शिंदे (1 सुवर्ण पदक), चैताली जगताप (1 सुवर्ण पदक). एकूण 18 सुवर्ण, 3 रौप्य, व 3 कांस्य पदके मिळवून मोलाची कामगिरी केली.
सदर स्पर्धेमध्ये प्रियांका मोरे हिने महाराष्ट्र संघाची प्रशिक्षक म्हणून तर निकिता यादव हिने व्यवस्थापक म्हणून भूमिका बजावली. या स्पर्धेत सातारा जिह्यातील सुजित शेडगे, विश्वतेज मोहिते, माया मोहिते, विठ्ठल गोळे, प्रसाद बेडेकर यांनी पंच म्हणून कार्य केले. तसेच प्रशांत दुधाने, प्रसाद गोळे, व प्रणाली जगताप यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य केले.









