साहित्य पाठीवरून नेण्यात मुकी प्राणी आघाडीवर, त्यांच्याच कष्टातून घडतोय गडाचा एक एक चिरा
सुधाकर काशीद / कोल्हापूर
शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडाच्या उभारणीत असंख्य हातांची सेवा आहे. किंबहुना मराठी साम्राज्याच्या एकजुटीचे ते एक भक्कम प्रतीक आहे. आता तीन-साडेतीनशे वर्षानंतर त्याचे जतन व संवर्धन सुरू झाले असून या कामात मुक्या जनावरांचे योगदान खूप मोलाचे ठरत आहे. रायगडावर सुरू असलेल्या कामासाठी दगड, विटा, वाळू किंवा अन्य आवश्यक ते सर्व अवजड साहित्य पाठीवरून वाहून नेण्यात दीडशे गाढवांचा ताफा आघाडीवर आहे. गाढवांकडून खाली मान घालून केल्या जाणाऱ्या या सेवेचे खूप वेगळेपण आहे. रायगड संवर्धनाचा एक एक चिरा त्यांच्याही कष्टातून घडत आहे.
रायगड म्हणजे सह्याद्रीचा अतिशय दुर्गम भाग. राजधानीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड निवडला. हिरोजी इंदुलकरांनी कसबीने गड बांधण्यात मोठा वाटा उचलला. गड म्हणजे केवळ तटबंदी राजवाडा असे नव्हे तर नैसर्गिक जलसाठीचेही नियोजन केले. आजही हे जलसाठे पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय ठरले आहेत. याच रायगडावर शिवरायांची समाधीही आहे. तीन-साडेतीनशे वर्षे ऊन वारा पाऊस अंगावर झेलणाऱ्या या गडाची पडझड झाली. काही अवशेष मातीच्या खाली दडले. मोठे दगड तटबंदीवरून दरीत कोसळले. दरवाजांच्या कमानी पडल्या. या परिस्थितीत रायगडाची संवर्धन करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. आणि संवर्धनाच्या या कामास सुरुवात झाली.
सर्वात कठीण काम होते ते गडावर पायथ्यापासून दगड, वाळू, चुना किंवा अन्य अवजड साहित्य वाहून नेण्याचे. यासाठी रोपवेचा वापर जरूर करण्यात आला. पण रोपवेसाठी प्रति किलो शुल्क आकारले जात होते. त्याचा खर्च मोठा होता. मात्र हा खर्च कमी करण्यासाठी व काही अवजड साहित्य वाहून नेण्यासाठी गाढवांच्या वापराचा पर्याय निघाला. रोप वेच्या शुल्काच्या निम्म्या दरात गाढवाच्या मालकांना मोबदला दिला जाऊ लागला. पूर्वीच्या काळापासूनच गाढवांकडून ओझे वाहून नेण्याचे काम करून घेतले जाते.
या कामासाठी 150 गाढवांचा ताफा आहे. पाठीवर ठेवलेले ओझे घेऊन गाढव गडाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात करते. खूप कष्टाचे हे काम. पण गाढव त्याच्या ताकदीनुसार हे काम करते. एकदा त्याने पाठीवर ओझे घेतले की उतरल्यावरच ते थांबते. वाटेत कुठेही बसत नाही. पण तरीही गाढव राबते म्हणून त्याला कितीही राबवून घ्यायचे नाही म्हणून त्याच्याकडून फक्त दोन ते तीन फेऱ्यातच काम करून घेतले जाते. उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी त्याचे काम थांबवले जाते. गडाच्या पायथ्याला तळ आहे. आतापर्यंत झालेल्या रायगड संवर्धनाच्या कामात गाढवांनी खूप मोठा वाटा उचलला आहे.
सरळ काम न करणाऱ्याला गाढव म्हणून उपमा देतो. पण चित्र वेगळे आहे. गाढव खूप सरळपणे कष्टाचे काम करते. आपल्या धन्याला उदरनिर्वाहासाठी मदत करते. रायगड संवर्धनाच्या कामात गाढवांच्या कष्टाची खरेच वेगळी नोंद ठेवावी लागेल.
-खासदारसंभाजीराजेछत्रपती, अध्यक्षरायगडविकासप्राधिकरण
उन्हाचा व गड चढण्याच्या कामाचा गाढवावर ताण पडू नये, म्हणून भल्या सकाळीच त्यांच्या कामाची सुरुवात होते. दोन फेऱ्या झाल्यावर त्यांचे काम थांबवले जाते. अडचणीच्या काळात या गाढवांची खूप मदत झाली. त्यांनी अवघड मार्गावरून वाट काढत ओझी वाहीली.
वरूण भामरे, संवर्धक रायगड विकास प्राधिकरण








