ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेने भाजप सोबत यावे अशी साद पुन्हा एकदा रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घातली आहे. रामदास आठवले यांनी आज अभिनेत्री पायल घोष कथित अत्याचार प्रकरणी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केले.
- शिवसेना येत नसेल तर राष्ट्रवादीला आमंत्रण देतो
रामदास आठवले म्हणले, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून शिवसेना-भाजप-आरपीआयचे सरकार बनवावे. उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. उर्वरीत तीन वर्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी अस्वस्थ आहे. जर शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत एकत्र यावे आणि सरकार स्थापन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
- योग्य कारवाई झाली नाही, तर आंदोलन करणार
दरम्यान, पायल घोष अत्याचार प्रकरणी बोलताना आठवले म्हणले, पायल घोष यांच्याशी माझे बोलणे झाले. या प्रकरणी मी विश्वास नांगरे पाटील, अभिषेक त्रिमुखे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले, पायल घोषने पोलीस संरक्षण मागितले आहे. याबाबत मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणार आहे. मात्र पायलचे काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची असेल. आम्ही तपासासाठी आठ दिवसांचा वेळ देतोय. जर योग्य दिशेने कारवाई झाली नाही, तर आम्ही आंदोलन करु. एक-दोन दिवसात आमचे एक डेप्युटेशन अनिल देशमुख यांनाही भेटणार आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.








