एलएचबी कोचमुळे प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी
प्रतिनिधी / बेळगाव
दक्षिण महाराष्ट्र व कर्नाटकाला जोडणारी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस शनिवार दि. 16 पासून नव्या रुपात धावणार आहे. अत्याधुनिक असे एलएचबी कोच या एक्स्प्रेसला जोडण्यात आले आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे. मिरज ते बेंगळूर या मार्गावर धावणाऱया या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने नवे कोच देण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनपूर्वी कोल्हापूर ते बेंगळूर या मार्गावर चन्नम्मा एक्स्प्रेस धावत होती. परंतु लॉकडाऊननंतर ही रेल्वे सुरू झाल्यानंतर ती मिरज ते बेंगळूर मार्गावर धावू लागली आहे. नुकतीच या रेल्वेसेवेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने या रेल्वेला अत्याधुनिक असे एलएचबी कोच जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात होती.
नैर्त्रुत्य रेल्वेचे हुबळी विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे क्र. (06589 व 06590) ही बेंगळूर-मिरज-बेंगळूर रेल्वे शनिवार दि. 16 पासून अत्याधुनिक अशा रुपात धावणार आहे. या रेल्वेला आता एलएचबी कोच असल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
एलएचबी कोचची वैशिष्टय़े…
एलएचबी म्हणजे लिंक हॉफमन बुश ही जर्मनीची कंपनी असून या कंपनीने हे रेल्वे कोच निर्मित केले आहेत. हे कोच प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत आरामदायी आहेत. या कोचमधून प्रवास करताना प्रवाशांना झटके लागणे कमी होणार आहे. जुन्या कोचमध्ये 72 कोच असायचे. परंतु एलएचबी कोचमध्ये बर्थची संख्या 84 झाली आहे. जुने कोच लोखंडी असल्याने ते वजनदार होते. परंतु हे नवे कोच स्टेनलेस स्टीलपासून बनविण्यात आल्याने वजनाने हलके आहेत. तसेच यामध्ये मॉडर्न टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आला आहे.









