नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी तसेच त्यांच्या सुटका करण्यात यावी , अशी मागणी केली आहे.
स्टॅलिन यांनी राष्ट्रपतींनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारसीचा स्वीकार करावा आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी. तसेच त्यांच्या तत्काळ सुटकेसाठी आदेश द्यावा. यासोबतच या सर्व सात आरोपींच्या तत्काळ सुटकेची मागणी तामिळनाडू मधील बहुतांश राजकीय पक्ष देखील करत आहेत. तसेच तामिळनाडूच्या जनतेची देखील अशीच इच्छा आहे. मागील तीन दशकात या सात जणांनी बऱ्याच यातना सहन केल्या असल्याचे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ए.जी.पेरारीवल याची काल ३० दिवसांसाठीची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. या आरोपीच्या आईच्या विनंतीवरुन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी ही सुट्टी मंजूर केली आहे. नलिनी श्रीहरन, मुरुगन, संथन, एजी पेरारीवलन, जयकुमार, रॉबर्ट पायस आणि पी. रविचंद्रन हे सात जण राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी आहेत.









