वार्ताहर/ राजापूर
अर्जुना, कोदवली नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
तालुक्याच्या पूर्व परिसरात रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून राजापूर शहरात पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जवाहर चौक येथील पान टपऱयापर्यंत पाणी आले असून चिंचबांध, वरचीपेठ, शिळ रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे. दरम्यान जिल्हय़ातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या.
राजापूर तालुक्यात मागील काही दिवस सातत्याने पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱया अर्जुना व कोदवली नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशातच रविवारी पूर्व परिसरात जोरदार पाऊस कोसळल्याने शहरात पुन्हा पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी दुपारपर्यंत राजापूर शहरात पाऊस नसल्याने पुराची कोणतीही शक्यता नव्हती. मात्र पूर्व परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने त्यातच दुपारनंतर शहरातही पाऊस सुरू झाल्याने काही वेळातच अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झाली असून पुराचे पाणी गणेशघाट, नवजीवन हायस्कूल, चिंचबांध ते वरचीपेठ तसेच शिळ रस्त्यावर आल्याने शिळ, गोठणे-दोनिवडे, चिखलगाव या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर कोदवली नदीचे पुराचे पाणी जवाहर चौकातील पान टपऱयांपर्यंत आले होते. रविवारी सायंकाळी पावसाचा जोर काहीसा वाढला होता. त्यामुळे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे. पुराच्या शक्यतेने जवाहर चौक तसेच शिवाजीपथ मार्गावरील दुकानदारांनी दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान रत्नागिरी शहरातही रविवारी सकाळपासून पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.









