वृत्तसंस्था/ दुबई
पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ दोन महिन्यांच्या कालावधीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. दरम्यान भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवि शास्त्री आणि अन्य प्रशिक्षक वर्गाचे जैव सुरक्षित वातावरणात संयुक्त अरब अमिरातमध्ये आगमन झाले.
भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवि शास्त्री, फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण हे अनुक्रमे आपल्या निवासस्थान असलेल्या ठिकाणाहून दुबईत रविवारी दाखल झाले. भारतीय संघातील खेळाडू आणि प्रमुख प्रशिक्षक यांचे येथे रविवारी आगमन झाल्यानंतर त्यांना आता आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. दरम्यान या सर्वांच्या कोरोना नियमावलीनुसार तीनवेळा चांचण्या घेतल्या जातील. संघाचे साहाय्यक स्टाफ त्याचप्रमाणे चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी यांना आयपीएलऐवजी स्वतंत्र जैव सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती बीसीसीआयच्या प्रवक्त्याने दिली. या सर्वांना सहा दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतर आयसीसीच्या अकादमीमध्ये प्रशिक्षणाला प्रारंभ केला जाईल. या प्रशिक्षण सत्रामध्ये लंकेचा नुवान झोयसा आणि भारताचा रघु यांच्याकडून भारतीय संघातील गोलंदाजांना मार्गदर्शन केले जाईल. हनुमा विहारीने हैद्राबादमध्ये श्रीधरसमवेत सराव केला तर राजकोटमधील स्वत:च्या अकादमीमध्ये पुजाराने सराव केला होता. या दौऱयासाठी 30 जणांचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला प्रयाण करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सिडनी आणि कॅनबेरा येथे टी-20 आणि वनडेचे सामने आयोजित करण्यात येणार आहेत तर ब्रिस्बेन, ऍडलेड, मेलबोर्न आणि सिडनी या ठिकाणी कसोटी सामने खेळविले जातील. या कसोटी मालिकेतील दिवस-रात्रीचा सामना ऍडलेडमध्ये होणार आहे.









