प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा उपनिबंधक यांच्या प्रयत्नामुळे बाजार समितीच्या लिलाव केंद्रात आंबा खरेदी-विक्रीला गुरुवार 23 एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. तीन बागायतदारांनी आपले आंबे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले तर 5 खरेदीदारांनी येथे हजेरी लावली. त्यावेळी एका तासामध्ये सुमारे 15 हजार रुपयांची खरेदी-विक्री झाली.
कोरोनामुळे स्थानिक स्तरावर आंबा खरेदी-विक्री केली जावी, यासाठी उपनिबंधक कार्यालयाने प्रयत्न सुरु केले. रत्नागिरीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च करुन दोन वर्षांपूर्वी लिलाव केंद्राची इमारत बांधण्यात आली होती. रत्नागिरीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव केंद्रात आतापर्यंत प्रक्रियाच झाली नव्हती. जागा भाजीपाला लिलावासाठी वापरण्यास सुरूवात झाली. गतवर्षी बाजार समितीने प्रयत्न केला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. कोकणातील बागायतदार वाशीतील दलालांशी बांधलेला असल्यामुळे स्थानिकस्तरावर लिलावाला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र कोरोनामुळे वाहतुकीत येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन यंदा आंबा खरेदी-विक्री प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय झाला. गुरुवारी दुपारी 3 वा. ही प्रक्रिया झाली. पण येथील अनेक बागायतदारांना याची माहिती नव्हती. पण बागायतदारांनी आंबा आणण्याऐवजी हजेरी लावली होती. या उपक्रमाच्या प्रचार, प्रसार केल्याने काही बागायतदारांनी दूरध्वनीवरुन विचारणा केली.
या शुभारंभाला 3 बागायतदारांनी आंबा विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला होता. त्या ठिकाणी बागायतदार व खरेदीदार यांच्यात दर निश्चित करुन खरेदी प्रक्रिया पार पडली. यावेळी 5 खरेदीदार उपस्थित होते. 5 आंबा पेटी, 5 क्रेट लुझ माल तर पिकलेल्या आंब्याचे बॉक्स ठेवण्यात आले होते. 5 डझनची पेटी सरासरी 1700 रुपयांनी विक्रीला काढली गेली. तर 7 क्रेटचे 7 हजार रुपये आले. या प्रक्रियेवेळी जिल्हा उपनिबंधक डॉ. गार्डी यांच्यासह पणनचे अधिकारी मिलिंद जोशी, बाजार समिती सचिव किरण महाजन, उपसभापती अनिल जोशी, माजी सभापती दत्तात्रय ढवळे, आंबा बागायतदार राजू पेडणेकर, प्रसन्न पेठे यांच्यासह अन्य लोकांची उपस्थिती होती.









