प्रतिनिधी / मुंबई
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे खुली होणार आहेत. आरोग्याचे सर्व नियम पाळून भक्तांसाठी प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये असेही ते म्हणाले.
राज्यात गेल्या काही दिवसापासून विरोधकांनी प्रार्थनास्थळे खुले करण्यासाठी विविध आंदोलने केली होती. अखेर सरकारने यावर निर्णय घेत सर्व प्रार्थनास्थळे खुली केली आहेत.
Previous Articleसोने-चांदी दरात घसरण
Next Article सोयाबीन खरेदीतून शेतकऱ्यांची लूट थांबवा








