प्रतिनिधी/ सातारा
एकीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना मोदी सरकार सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. उलट सलग 21 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच करत आहे. कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी करवाढ आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
काँग्रेस कमिटीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 107 बॅरलच्या वर असताना सुद्धा सरकार आजच्या पेक्षा कमी दराने पेट्रोल नागरिकांना देत होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 40 रूपये बॅरल डॉलर असतानासुद्धा नागरिकांना 87 रूपये दराने पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे मोदी सरकारने केलेली दरवाढ ही निर्दयी असून ती नागरिकांवर अन्याय करणारी आहे. आज डिझेलची दरवाढ होऊन डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे. हे गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच घडले आहे. डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱयांना बसणार आहे. कारण शेतकरी डिझेलचा मोठय़ा प्रमाणात वापर करत असतो. डिझेलची दरवाढ झाल्यामुळे प्रवास खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचा फटका महागाईद्वारे नागरिकांना सहन करावा लागत आहे. सरकारने नागरिकांवर लादलेला हा जिझीया कर आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये फक्त 2 लाख कोटी फक्त मदत होणार आहे. ते पैसे सरकार या पेट्रोलच्या करवाढीतून वसूल करत आहे. त्यामुळे सरकारने केलेली पेट्रोल ही दरवाढ ही जनतेवर अन्याय करणारी करवाढ आहे. कोरोना या संकाटाला सामोरे जात असताना जगात इतर देश नागरिकांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरण करत आहेत. पण भारत सरकारने अशा प्रकारचे थेट पैसे हस्तांतरण केले नाही. त्यामुळे पॅकेज हे ‘कर्ज पॅकेज’ आहे, अशी टीका केली.
भारत-चीन सीमावादावर आम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क
गलवान खोरे, भारत-चीन सीमावाद याबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा सर्वांना हक्क आहे. त्यानुसारच राहूल गांधी व काँग्रेस पक्ष मोदी सरकारला प्रश्न विचारत आहे. त्याची उत्तरे सरकारने देणे अपेक्षित आहे. आमच्या महाराष्ट्रातील सहकारी पक्षाची भूमिका वेगळी असू शकते पण आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही यापुढेही प्रश्न विचारत राहू. असेही त्यांनी सांगितले.








