मुंबई/प्रतिनिधी
राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपले. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत.
राज्यात काय काय बंद राहणार
राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.
या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात सरकारच्या निर्णयाला विरोधीपक्ष म्हणून सहकार्य करण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर येत आहे.








