प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अनेक प्रयत्न करुनही वेळ मिळत नाही. म्हणून 26 जानेवारी रोजी उपोषण करण्यात येईल, असा इशारा रिफायनरी समर्थक संस्थांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱयांना तशा संदर्भात एक निवेदन देण्यात आले.
राजापूर तालुक्यात भव्य रिफायनरी कॉम्प्लेक्स व्हावा, अशी मागणी अनेक संस्था संघटनांनी लावून धरली आहे. सुमारे 45 संघटना एकत्र आल्या असून त्यांनी रिफायनरी समर्थनासाठी फेडरेशनची निर्मिती केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रिफायनरीचा मुद्दा मार्गी लावावा अशी विनंती करण्याचे ठरवण्यात आले. आजवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी करण्यात आलेले सर्व प्रयत्न अयशस्व ठरल्याने आता आंदोलनाचा पर्याय स्वीकारण्याचे ठरवण्यात आले.
रिफायनरी समर्थकांचे नेते व निवृत्त शासकीय अधिकारी केशव भट यांनी सांगितले की, आम्ही जिल्हाधिकाऱयांना एक नोटीस दिली आहे. रिफायनरी समर्थकांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे मांडता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ उपलब्ध करुन द्यावा. आजवर भेटीचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. 26 जानेवारीपासून उपोषण करण्यात येईल, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मूखपत्राला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले होते की, लोकांना जर रिफायनरी हवी असेल, तर आम्ही त्याचा विचार करु. शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांनी म्हटले होते की, रायगड किंवा गुहागरमध्ये रिफायनरी होणार. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी राजापुरातच व्हावी म्हणून जोरदार आग्रह धरला आहे. सेनेकडून रिफायनरीला अनुकूल पावले उचलली जात असताना रिफायनरी समर्थकांनी मुख्यमंत्री भेटीचा जोरदार आग्रह धरला आहे.









