पंढरपूर / ऑनलाईन टीम
कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता राज्यात सतत होत असलेल्या लॉकडाऊनवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्रात लोकशाही आहे असं म्हटलं जायचं पण आता महाराष्ट्रात ‘लॉक’शाही सुरू आहे,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत फडणवीस बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात आहे. कोरोना रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. अशी अवस्था या सरकारनं महाराष्ट्राची करून ठेवली आहे. कोरोना रोखण्याचा उपाय म्हणून कधी लॉक, कधी अनलॉक असा खेळ सुरू आहे. लॉकडाऊनसारख्या गोष्टी गरजेच्या असतात. पण ते करताना ज्यांचा रोजगार जातो, त्यांना किमान दिलासा म्हणून सरकारी तिजोरीतून दोन रुपये दिले पाहिजेत याचं भानही या सरकारला नसल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड या शेजारच्या राज्यांत तिथल्या सरकारांनी कोरोना काळात सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना मदत केली. वीज बिलं माफ केली. सवलती दिल्या. मुळात सरकार असतं कसासाठी? अडचणीत मदत करण्यासाठी. मात्र, राज्यातलं ठाकरे सरकार हे सावकारांपेक्षाही भयंकर असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
Previous Articleपंजाब : कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 72 हजार 772 वर
Next Article सातारा : देऊर येथून 27 तोळे सोने चोरीला








