गांधी नगर येथील सर्व्हिस रस्त्यावर कोसळली होती संरक्षक भिंत
प्रतिनिधी /बेळगाव
गांधी नगर येथे राष्ट्रीय महामार्गाशेजारील भिंत कोसळल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले होते. समस्येबाबत तरूण भारतने वृत्त प्रसिध्द करताच कोसळलेल्या भिंतीचे अवषेश हटवून नविन भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भिंत उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरू असून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येण्यासाठी सोडण्यात आलेल्या सर्व्हीस रस्त्या शेजारील भिंत कोसळली होती. सदर भिंत कोसळून कित्येक महिने झाले मात्र दुरूस्तीच्या दृष्टीने कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. 100 फुट लांबीची भिंत कोसळल्याने या रस्त्यावर अडथळा निर्माण झाला होता. भिंत कोसळल्याने नागरिकांना समजण्यासाठी बॅरिकेड्स ठेवण्यात आले होते. पण हा रस्ता अरूंद असल्याने वाहनधारकांना ये-जा करताना अडचण निर्माण झाली. अशातच भिंत कोसळून रस्त्यावर पडल्याने अवजड वाहनांना अडचणीचे ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार महामंडळाकडून रस्त्याच्या दुरूस्तीसाठी वेळोवेळी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. मात्र कोसळलेल्या भिंतीच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले होते. माती घसरून महामार्गावरून जाणाऱया वाहनधारकांना अपघात घडत होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामंडळाने याची पाहणी करून भिंतीचे बांधकाम करावे अशी मागणी करण्यात आली होती.
या समस्येबाबत तरूण भारतने वृत्त प्रसिध्द करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेवून कोसळलेल्या भिंतीचे अवषेश हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच लागलीच कॉक्रीटची भिंत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर भिंत उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रस्त्यावरील अडथळा हटवून वाहनधारकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने भिंत उभारणीचे काम हाती घेण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









