प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाबाधितांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यामुळे जिह्यातील संबंधित रुग्णालयांना या योजनेच्यावतीने नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. ‘तरूण भारत’मध्ये या बाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासन स्तरावरून दखल घेण्यात आली.
कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करावेत, असे स्पष्ट आदेश शासनाकडून खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. त्यासाठी रत्नागिरी जिह्यातील अनेक रुग्णालयांकडून अर्जांवर स्वाक्षऱयाही घेण्यात आल्या. तरीही या रुग्णालयांमध्ये जागा नसणे, रुग्णाला दाखल करून न घेणे, या बाबतच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या होत्या. त्यानंतर या बाबत ‘तरूण भारत’मध्ये सातत्याने वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल जनआरोग्य योजनेने घेतली आहे. या नोटीसमुळे रत्नागिरी जिह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये आता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होणार आहेत. त्यामुळे आता या योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांना कोरोना रुग्ण घेणे भाग पडेल. अन्यथा रुग्ण योजनेकडे तक्रार करू शकतो. यासाठी टोल फ्री क्रमांक 18002332200 यावर अथवा योजनेचे आरोग्यमित्र यांच्याकडे तक्रार करू शकतात.
या नोटीसांमध्ये म्हटले आहे की, लाभार्थ्यांना पॅशलेस उपचार मिळाल्याबद्दल आपले रुग्णालय आमच्याकडे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेवाय) अंतर्गत दिले आहे. परंतु सामंजस्य कराराच्या काही अटींचे उल्लंघन झाले आहे. वृत्तपत्र व समाजमाध्यमात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार आपले रुग्णालय पात्र एमजेपीजेवाय लाभार्थी असूनही योजनेंतर्गत कोविड-19 रूग्णांना प्रवेश नाकारत आहेत. आपले रुग्णालय क्रिटिकल केअर व पल्मोनोलॉजीसाठी बनवले गेले आहे. कोविड- 19 पासून पीडित एमजेपीजेवाय लाभार्थी पॅशलेस उपचार घेऊ शकतात. मात्र निवडक लाभार्थ्यांवर उपचार केले जात आहेत. लाभार्थी व कोविड-19 पासून पीडित सर्व पात्र एमजेपीजेवाय लाभार्थ्यांना पॅशलेस उपचार देत नाहीत.
प्रत्येक पात्र रूग्णाला योजनेचा लाभः डॉ. लोटलीकर
आमच्या हॉस्पीटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र रूग्णाला यापूर्वीही दिला जात होता आणि यापुढेही तो दिला जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीत आम्ही कसलीही कसूर सोडलेली नाही. उलट कोरोना काळामध्ये ही योजना सर्वसामान्यांसाठी लाभदायी ठरत आहे. तरी कठीण काळात लाभधारक ठरलेल्या या योजनेचा लाभ प्रत्येक कोरोनाबाधित रूग्णाने घ्यावा, असे आवाहन शहरातील रामनाथ हॉस्पीटलचे डॉ. संजय लोटलीकर यांनी केले आहे.
सध्या जिल्हा शासकीय रूग्णालय आणि इतर काही रूग्णालये कोविड झाल्याने नॉन कोविड रूग्णांची संख्या आमच्या हॉस्पीटलमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. तसेच आमच्या इथे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेचीही अंमलबजावणीही सुरू असल्याचीही माहिती डॉ. लोटलीकर यांनी दिली. रामनाथ हॉस्पीटलमध्ये बहुतांश रूग्ण हे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील येत असतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होवू नये म्हणून अद्यापही आम्ही कोविड हॉस्पीटल सुरू केलेले नाही, मात्र लवकरच कोविड रूग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचेही डॉ. लोटलीकर यांनी सांगितले.









