दोडामार्ग – वार्ताहर
वेंगुर्ले तसेच मालवण या दोन ठिकाणी मणेरी येथील नदीचे पाणी नेणाऱ्या पाईप लाईनचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सासोली – हेदुस मध्ये या पाईपलाईनमुळे साईडपट्टी पूर्णतः हा उखडली गेली असून येणाऱ्या पावसाळ्यात वाहनचालकांना पुन्हा एकदा तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
वेंगुर्ले तसेच मालवण या दोन ठिकाणी तिलारी जलाशयाचे पाणी नेण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी मणेरी येथील नदीपात्रातून पाईपलाईन द्वारे पाणी नेले जाणार आहे. या पाईपलाईनचे सध्या सासोली – हेदुस परिसरात काम चालू आहे. दोडामार्ग – बांदा या महामार्गालगतच्या साईडपट्टी मधून ही पाईपलाईन नेण्यात येत आहे. गेल्या एक दोन वर्षांपासून या पाईपलाईनचे काम सुरू आहे. या पाईपलाईनच्या कामावरून अनेक ठिकाणी ग्रामस्थाचे पाईपलाईनशी निगडित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यासोबत खटकेही उडाले आहेत. ज्या भागातून ही पाईपलाईन जाते आहे तेथील रस्त्यालगतची साईडपट्टी पूर्णतः उखडली गेली आहे.
सध्या उन्हाळ्यात या उखडलेल्या साईडपट्टीमुळे आसपासची घरे व वाहन चालक यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच पुढील महिन्यातील पावसाळ्यात देखील या साईडपट्टीवर दलदल होणार आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या पावसा दरम्यान या साईडपट्टीच्या दलदलीत वाहने रुतून बसली होती. त्यावरून येणाऱ्या पावसाळ्यात देखील या ठिकाणी काय परिस्थिती उद्भवेल ते पहावयास मिळाले आहे. ते पाहता पावसाळ्यापूर्वी या पाईपलाईन तसेच साईडपट्टीचे काम त्वरित पूर्ण करून सर्वांची गैरसोय टाळावी अशी मागणी व्यक्त होत आहे.









