सात करारांवर स्वाक्षऱया : ‘नेबर फर्स्ट’ धोरणात बांगलादेश महत्त्वाचा देश : पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी गुरुवारी संयुक्तपणे चिल्हटी-हल्दीबाडी रेल्वे लिंकचे उद्घाटन केले. यासोबतच 1965 पासून बंद झालेल्या 6 पैकी 5 रेल्वे लिंक पुन्हा सुरू करण्यात आल्या. दोघांनीही भारत-बांगलादेश व्हर्च्युअल समिटमध्ये भाग घेत या योजनेला मूर्त रुप दिले. तसेच अन्य सात करारांवर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी स्वाक्षऱया केल्या.
चिल्हटी-हल्दीबाडी रेल्वे लिंक भारत आणि बांगलादेश दरम्यान आहेत. ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही लिंक सुरू झाल्यावर बांगलादेश ते आसाम आणि बंगाल यांच्यामधील संपर्क सुधारला जाईल. सुरुवातीला या लिंकचा वापर माल वाहतुकीसाठी केला जाईल, नंतर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. हा मार्ग भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या 1965 च्या युद्धाच्यावेळी बंद झाला होता.
बांगलादेश 1971 च्या युद्धामध्ये विजयाचा 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. म्हणूनच या व्हर्च्युअल शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बांगलादेशच्या पंतप्रधानांनी कोरोनाविरुद्ध लढय़ात मोठे धैर्य दाखवले आहे. कोरोना काळात, दोन्ही देशांमध्ये आरोग्य सेवांबद्दल चांगले सहकार्य होते आणि भारत बांगलादेशला सर्वतोपरी मदत करेल. बांगलादेश हा आमच्या ‘नेबर फर्स्ट’ धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मोदी आणि शेख हसिना या द्वयींनी ‘बंगबंधू-बापू’ डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन केले. महात्मा गांधी आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. दोन्ही देशांमधील तरुण या महान व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घेत राहतील, असेही मोदी म्हणाले. याचदरम्यान 1971 च्या युद्धात मरण पावलेल्या भारतीय सैनिकांना हसीना यांनी श्रद्धांजली वाहिली.









