2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
बेंगळूर :
देशातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) जनक फकिरचंद कोहली याचे गुरुवारी वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱया फकिरचंद कोहली यांना 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएसचे) संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते. टीसीएसचे पहिले सीईओ म्हणून देशाला 100 अब्ज डॉलर्सचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग तयार करण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
फकिरचंद कोहली यांचा जन्म 19 मार्च 1924 रोजी पेशावरमध्ये झाला होता. पेशावर आणि कॅनडा येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1951 मध्ये ते टाटा इलेक्ट्रीक कंपनीत रूजू झाले होते. 1970 मध्ये त्यांच्यावर टाटा इलेक्ट्रीक कंपन्यांच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सर्वप्रथम त्यांनी टीसीएसची सूत्रे हाती घेत पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. 1999 मध्ये वयाच्या 75 व्या वषी ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही कोहली टीसीएसचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. 1991 मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये कोहली सक्रियपणे सहभागी होते. हा भारतातील हार्डवेअर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग होता.









