मुंबई/प्रतिनिधी
भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप आमदार म्हात्रे यांनी केला आहे. दरम्यान, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यापुढेच मंदा म्हात्रे यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. मी दोनदा विधानसभेवर निवडून आले आहे. तरीही पक्षाकडून वारंवार अन्याय केला जात आहे. मी चांगलं काम करत असूनही मला डावललं जात असल्याचा आरोप यावेळी मंदा म्हात्रे यांनी केला आहे. मी स्वतःच्या हिमतीवर मी निवडून आलो आहे. २०१९ च्या निवडणुकीत आपण अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते, असं देखील यावेळी मंदा म्हात्रे म्हणाल्या.
त्याचप्रमाणे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या कामावर निवडून आल्याचा दावा देखील मंदा म्हात्रे यांनी केला आहे.
स्वतःच्या हिमतीवर दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतर, कर्तृत्त्व सिद्ध करून दाखवून सुद्धा पक्षाकडून डावललं जातं असं म्हणत मंदा म्हात्रे यांनी यशोमती ठाकूर यांच्यासमोर आपल्या पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. मंदा म्हात्रे यावेळी म्हणाल्या, “महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, माझं कर्तृत्त्व होतं. पण महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे प्रकार होतात,” असं म्हणत मंदा म्हात्रे यांनी पक्षाविषयी उघड नाराजी व्यक्त केली आहे.








