म्हसवड / प्रतिनिधी :
माण तालुक्यातील दहिवडी, पिंगळी, गोंदवले व वाघमोडेवाडी या गावांसाठी वरदान ठरलेल्या पिंगळी (ता.माण) येथील ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तालुक्यातील मुख्य ठिकाणीच पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक गावांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
तलावाच्या भराव्यावर काटेरी झाडे, झुडपे यांची झालेली मोठ्या प्रमाणात वाढ, तलावातील पाण्याची भराव्या खालून होणारी गळती, संरक्षक कठड्यावर वाढलेली झाडे, विना परवाना घेण्यात आलेल्या तलावातील विहीरी शेजारीच असलेल्या मेष पालन केंद्राचे वाढते अतिक्रमण व त्यांनी काढलेली बोअरवेल, तलावाच्या देण्यात आलेल्या भाडे पट्टा करार जागा व अनधिकृत बांधकामे यामुळे तलावाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
तसेच पिंगळी पोट कालवे देखील अनेक ठिकाणी बुजवण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी सांड पाणी सोडण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचे दिसत आहे. यावर तात्काळ कारवाई करून पुन्हा या तलावाला व पोट कालव्याला जीवदान मिळावे, अशी नागरिकांची मागणी आहे.









